
दत्तावतार, दत्तोपासनेवर अनेकविध मराठी रचना करणारे टेंबे स्वामी महाराज Shrimad Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj
- Vedmata Gayatri J & D Kendra
- Jun 26
- 3 min read

दत्तावतार, दत्तोपासनेवर अनेकविध मराठी रचना करणारे टेंबे स्वामी महाराज: Shrimad Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj
आधुनिक काळातील एक दत्तोपासक सत्पुरुष आणि प्रख्यात वेदाभ्यासक म्हणून टेंबेस्वामींना ओळखले जाते. टेंबेस्वामी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील माणगाव येथे श्रावण वद्य पंचमीला झाला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते. दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी भाषेत विपुल साहित्य लेखन केले. पत्नीच्या निधनानंतर उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला.
एक जाज्वल्य दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज होय. बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवाची छाप कोणावरही चटकन पडत असे. लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचे अध्ययन केले होते. त्रिकाळ स्नानसंध्या. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून वैश्वदेव-नैवेद्य करून भोजन, याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. सात्त्विक वृत्ती, वेदोक्त आचार व संयम यांद्वारे टेंबेस्वामींनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला.
सात वर्षे निग्रहपूर्वक दत्तोपासना
टेंबेस्वामी प्रथम नरसोबाच्या वाडीस गेले. तेथे गोविंदस्वामी ह्या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्तोपासना सुरू केली. त्यांना पुढे वारंवार दत्तात्रेयाचे साक्षात्कार होऊ लागले आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयानेच त्यांना मंत्रोपदेश दिला, असे सांगतात. त्यांनी तेथे योगाभ्यासही केला. १८८२ मध्ये त्यांनी चांद्रायण व्रत केले. पुढे माणगाव येथे त्यांनी दत्ताचे मंदिर उभारले आणि तेथेच मौनव्रताने राहू लागले. सात वर्षे त्यांनी अशी निग्रहपूर्वक दत्तोपासना केली. १८९१ मध्ये यात्रा करीत असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीनिधनानंतर तेराव्या दिवशीच त्यांनी संन्यास घेतला. पुन्हा तीर्थयात्रा सुरू केली. विविध ठिकाणी ते राहत. पुराण-प्रवचनांद्वारे लोकांत धर्मजागृती करीत. अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना केली. दत्तोपासनेचा प्रचार केला. या उपासनेला प्रेरक अशी विपुल ग्रंथरचनाही केली.
एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक
एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणजे स्वामीमहाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय, आणि जीवनदृष्टी आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. निसर्गाकडे चला असा संदेश त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र, नद्या यांच्या वर्णनावरून अनुभवाला येतो. त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ मध्ये समाधी घेतली. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा विश्वशांतीमंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामी महाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि टेंबेस्वामींची भेट
नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज्यांचे स्मृतिमंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय. श्री कस्तुरे यांनी यतिश्वर परियात्रा या स्वामी महाराजांच्या चरित्रात एक स्वप्नदृष्टांत सांगितलेला आहे. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या स्वप्नात एकदा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आले. त्यांनी जेव्हा दत्तप्रभूंना विचारणा केली की, हे कोण आहेत? तेव्हा दत्तप्रभूंनी उत्तर दिले की, ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असून ते म्हणजे माझाच दत्तावतार आहेत. हे लक्षात घेऊन तू त्यांच्या दर्शनाला जा. अर्थात दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार यतिचक्रवर्ती वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला गेले व त्यांचे मन प्रसन्न झाले.
टेंबेस्वामींनी रचलेले श्रीगुरुस्तोत्र
भावें नमूं श्रीगुरुच्या पदासी । जे आपदासी हरि दे पदांसी ।दासीपरी श्री नमि ज्या पदांसी । यासी भजे तो नमितों पदांसी ॥ १ ॥
सततविनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य । सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासी सभ्य ।समद विमद होती यत्प्रसादे न हो ती । कुगति सुगति देती त्या पदा हे विनंती ॥ २ ॥
गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा ।हृतवदान्यमदा तव दास्य दे । अमददा गदहा न कुदास्य दे ॥ ३ ॥
नमस्ते भवारे नमस्ते शतारे । नमस्तेऽघवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे ।नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे । नमस्तेऽरिवैरे समस्तेष्टसत्रे ॥ ४ ॥
गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी । गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी ।सतत विनत होतां वारि जें आपदांसी । सतत विनत होऊं आम्हीं ही त्या पदांसी ॥ ५ ॥
भावें पठति जे लोक हें गुरुस्तोत्रपंचक । तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ॥ ६ ॥
॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीविरचितं श्रीगुरुस्तोत्रं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥
Comentários