top of page
Search

Tanjawar's Periya covil तंजावरचं ‘पेरिय कोविल’

Updated: Oct 19, 2025

चोळ/चोल राजवंश हा दक्षिण भारतातला एक प्राचीन राजवंश. आजच्या तमिळनाडूचा बराच मोठा भूभाग चोळ राजांच्या आधिपत्याखाली होता. चोळ राजे अत्यंत विजिगीषु वृत्तीचे होते. अशोकाच्या शिलालेखात चोळ साम्राज्याचा उल्लेख आहे. ‘कॉमन एरा’च्या पहिल्या शतकात होऊन गेलेला करिकाल चोळ हा या राजवंशातला इतिहासाला ज्ञात असलेला पहिला थोर राजा. त्यानं पांड्य व चेर या दक्षिणेकडील त्याच्या शेजारीसाम्राज्यांचा पराभव केला आणि श्रीलंकेवर स्वारी केली. त्याची राजधानी उरैयूर इथं होती. पुढं नवव्या शतकात त्याच्या विजयालयनामक वंशजानं मदुरेच्या पांड्यांचा प्रदेश जिंकून त्या प्रदेशातल्या तंजावर इथं आपली राजधानी स्थापन केली.


मात्र, तंजावर भरभराटीला आणलं ते विजयालयानंतर दीडशे वर्षांनी राज्यावर आलेल्या राजराजा पहिला या अत्यंत कर्तबगार, शूर आणि थोर सम्राटानं. याचं मूळ नाव अरुलमोळीवर्मन. राजराजानं शेजारच्या चेर व पांड्य राजांचा तर पराभव केलाच; पण मालदीव बेट जिंकलं आणि श्रीलंकेवर स्वारी केली. त्यानं राज्यकारभारात सुधारणा घडवून आणल्या, कला आणि साहित्य यांना उदारहस्ते आश्रय दिला, आग्नेय आशियात आपलं आरमार पाठवलं आणि एका समृद्ध, कलासक्त आणि भव्य अशा साम्राज्याचा पाया घातला.



राजराजा चोळा हा शिवभक्त होता. त्यानं आपल्या कारकीर्दीत शिवाची अनेक भव्य मंदिरं बांधली; पण त्यानं बांधलेलं सर्वोत्कृष्ट मंदिर म्हणजे तंजावरचं बृहदीश्वर मंदिर! हे मंदिर इतकं भव्य आहे की अजूनही तमिळनाडूमध्ये या मंदिराला ‘पेरिय कोविल’ म्हणजे ‘प्रचंड मंदिर’ म्हणूनच ओळखलं जातं. द्रविड स्थापत्यशैलीचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं हे मंदिर गेली हजार वर्षं तंजावरमध्ये दिमाखात उभं आहे.


राजराजा चोळा सन ९८५ या वर्षी राज्यावर आला. त्याच्या राज्याभिषेकाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी त्यानं बृहदीश्वरमंदिराला सुवर्णकलश भेट दिला होता असा उल्लेख मंदिराच्या जगतीवर कोरलेल्या शिलालेखात आहे. म्हणजेच हे मंदिर सन १०१० या वर्षी बांधून पूर्ण झालं होतं. शिलालेखामध्ये या मंदिराचा उल्लेख ‘राजराजेश्वरम-उदयार’ असा आहे. ‘शिवपादशेखर’ ही राजराजा चोळाची उपाधी होती आणि खरोखरच त्या उपाधीला तो थोर राजा जागला आणि त्यानं इतकं देखणं मंदिर निर्माण केलं. पुढं हे मंदिर बृहदीश्वरमंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.


या भव्य देवालयाचं गोपुर ६१ मीटर उंचीचं असून त्यात तेरा मजले आहेत. त्यावर सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. वर द्रविड स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य असलेली स्तूपी आहे. ही स्तूपी म्हणजे मोठा अष्टकोनी घुमटाकार प्रस्तर जवळजवळ ८० टन वजनाचा आणि एकाच ग्रॅनाइट पाषाणातून घडवलेला आहे. एवढी प्रचंड शिळा त्या काळात जेसीबी, क्रेन्स वगैरे आधुनिक यंत्रसामग्री नसताना जवळजवळ दोनशे फूट उंचीवर कशी चढवली असेल याचा विचार करूनच मती गुंग होते. हा ८० टनी घुमट मंदिरावर चढवताना जवळच्या एका गावापासून मंदिराच्या शिखरापर्यंत कित्येक किलोमीटर लांबीचा मातीचा रॅम्प करण्यात आला होता आणि त्या रॅम्पवरून हत्तींनी तो दगड ओढत वर नेला होता असे उल्लेख प्राचीन तमिळ ग्रंथात आढळतात.


हे संपूर्ण मंदिर पूर्णपणे अत्यंत कठीण अशा ग्रॅनाईट दगडात बांधलेलं आहे, तेसुद्धा शुष्कसंधी या पद्धतीचा वापर करून. संपूर्ण मंदिरासाठी एक लाख ३० हजार टन ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे मंदिर ज्या परिसरात आहे तिथून आसपासच्या पन्नास किलोमीटरच्या परिघात कुठंही ग्रॅनाईटच्या खाणी आढळत नाहीत. हा संपूर्ण दगड त्या काळी मंदिराच्या ठिकाणी कसा आणला गेला असावा?


हे देवालय बांधताना त्याची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की भर दुपारी या देवळाच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. मुख्य मंदिरापुढं स्वतंत्र नंदीमंडपात बसवलेला, सुमारे २० फूट लांब, आठ फूट रुंद व ११ फूट उंच असा भव्य, एकाच प्रचंड प्रस्तरशिळेतून कोरून काढलेला देखणा नंदी हेदेखील या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग २७ फूट उंच आहे, म्हणजे जवळजवळ दोनमजली उंचीचं ते आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकपाषाणी लिंगांपैकी ते एक आहे.


अतिशय भव्य आणि उत्तुंग अशा या शिवमंदिराला ‘युनेस्को’नं ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून दर्जा दिला आहे. गाभाऱ्याची भिंत दोनमजली आहे. बाह्य भिंतीवर अनेक देवकोष्ठ आहेत, ज्यांमध्ये शिवाच्या अनेक वेगवेगळ्या अवस्थेतील मूर्ती कोरलेल्या आहेत. वीरभद्र, भिक्षाटनशिव, चंद्रशेखरशिव, शिव-विष्णू यांचं एकत्रित रूप असलेला हरिहर, पार्वतीचं पाणिग्रहण करणारा कल्याणसुंदर शिव, लिंगातून प्रकट होणारा लिंगोद्भव, श्रीनटराज अशा विविध रूपांमधून आपल्याला इथं श्रीशंकरांचं दर्शन होतं. सर्व शिल्पं अत्यंत उच्च कलात्मक दर्जाची आहेत.


तंजावरच्या या अत्यंत भव्य बृहदीश्वर मंदिराचा आणि महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. सन १६७६ मध्ये विजापूरच्या सुलतानानं व्यंकोजीराजे भोसले यांना तंजावरला सरदार म्हणून पाठवलं. व्यंकोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे सावत्रभाऊ. त्याच घराण्यातले बाबाजीराजे भोसले हे सध्या तंजावरचे राजे आहेत. तंजावरकर भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, एक प्रवेशद्वारही बांधलं, एक-दोन नवीन छोटी मंदिरंही बांधली. मंदिरप्रांगणात भोसलेघराण्याची वंशावळ कोरलेली आहे. आज या मंदिराची व्यवस्था सरकारतर्फे होत असली तरी आजही बाबाजीराजेंना आणि भोसलेराजांना इथं सर्वोच्च मानाचं स्थान आहे.


कुठल्याही भारतीय व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा असं हे तंजावरचं उत्तुंग बृहदीश्वरमंदिर शक्य असेल तर प्रत्येकानं पाहिलंच पाहिजे. तंजावरला तिरुचिरापल्ली किंवा त्रिची इथून विमानानं जाता येतं. रेल्वेनं तंजावर हे चेन्नईपासून ३२६, तर मदुराईपासून २१० किलोमीटरवर आहे.



Ancient Indian temple complex with detailed carvings against blue sky PANDITJIPUNE.


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2026 

bottom of page
https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false